


पिंपरी-चिंचवड, ता.१: शहरातील वाढलेली गुन्हेगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती व अपुऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे विद्यमान पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पिंपरी-चिंचवड शहर, देवेंद्र तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

सविनय निवेदन असे की, पिंपरी-चिंचवड महानगर हे महाराष्ट्रातील एक प्रगत औद्योगिक, शैक्षणिक व रोजगाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही काळात शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे या शहराची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत चालली आहे. नागरिकांमध्ये भीती, असुरक्षितता आणि पोलीस प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अलीकडील काळात घडलेल्या गंभीर घटनांनी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले आहे. विषारी दारू प्रकरणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. महिलांवरील अत्याचार, विनयभंग व कामावर जाणाऱ्या महिलांवरील छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देहूरोड परिसरातील खूनाची घटना, राजकीय नेत्याची निर्घृण हत्या, टोळीगिरी, खंडणी, मादक पदार्थांची विक्री, गोळीबार यांसारख्या गंभीर घटनांनी नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.
तसेच चिंचवड परिसरातील खासगी वाहनांची सर्रास तोडफोड, भररस्त्यात वाहनांवर हल्ले, संत तुकाराम नगर येथे लाकडी दांडक्यांनी वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना उघडपणे घडत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे या घटनांमधून स्पष्ट दिसून येते.
याशिवाय पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक प्रमुख व रहदारीच्या रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत खुलेआम तृतीयपंथीय व महिलांकडून सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय हा देखील चिंतेचा विषय बनला आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर व सामाजिकदृष्ट्या घातक प्रकारांमुळे शहराची प्रतिमा मलिन होत असून नागरिक, महिला, विद्यार्थी व कुटुंबांना मोठ्या प्रमाणात गैरसोयी व असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात अवैध गुटखा विक्री, मटका, लॉटरी, विविध बेकायदेशीर व्यवसाय आणि इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा प्रकारच्या गुन्हेगारी व बेकायदेशीर कारवायांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची जनमानसात भावना आहे.
विशेष बाब म्हणजे, यापूर्वीच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे वातावरण निर्माण झाले नव्हते. पिंपरी-चिंचवड शहराने यापूर्वी अशी भयावह परिस्थिती अनुभवली नव्हती. मात्र सध्याच्या काळात शहराची वाटचाल चुकीच्या दिशेने होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्याच्या पोलीस आयुक्तांनी रात्री १० नंतर विविध निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी हा निर्णय गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी ठरलेला नाही. उलट सामान्य नागरिक, नोकरी करणारे कर्मचारी, व्यावसायिक, विद्यार्थी, महिला व रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सामान्य जनतेवर निर्बंध लादले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, शहरातील नागरिकांमध्ये “कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगार उघडपणे कायद्याचे उल्लंघन करत आहेत आणि त्यांना कोणतीही भीती उरलेली दिसत नाही.
पिंपरी-चिंचवड हे एकेकाळी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रगत शहर म्हणून ओळखले जात होते. परंतु आज वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, खून, खासगी वाहनांची सर्रास तोडफोड, अवैध धंदे, खुलेआम सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय आणि संघटित गुन्हेगारी यांमुळे शहराची प्रतिमा राज्यभर खराब होत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून यासाठी संबंधित पोलीस प्रशासनाची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे.
मागण्या :
१. पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
२. शहरातील वाढत्या गुन्हेगारीस कारणीभूत ठरत असलेल्या प्रशासकीय त्रुटींची चौकशी करण्यात यावी.
३. विषारी दारू प्रकरण, खून, महिलांवरील अत्याचार, खासगी वाहनांची तोडफोड, देहविक्री, संघटित गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांबाबत विशेष तपास पथक नियुक्त करण्यात यावे.
४. देहूरोड, चिंचवड, संत तुकाराम नगर, पिंपरी, निगडी, भोसरी तसेच इतर संवेदनशील भागांमध्ये विशेष गुन्हेगारीविरोधी मोहीम राबविण्यात यावी.
५. अवैध गुटखा, मटका, लॉटरी, मादक पदार्थांचे जाळे व इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्यात यावी.
६. नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिणामकारक उपाययोजना राबवून पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यात यावा.
७. पिंपरी-चिंचवड शहरातील सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन विद्यमान पोलीस आयुक्त यांची तात्काळ उचलबांगडी करून त्यांच्या जागी सक्षम, कर्तव्यदक्ष, कठोर व जनहिताला प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.
महोदय, पिंपरी-चिंचवड शहराची घसरत चाललेली प्रतिमा, वाढती गुन्हेगारी, नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना, गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली निर्भयता, वाढते अवैध धंदे, खुलेआम सुरू असलेले अनैतिक व्यवसाय आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश लक्षात घेता, विद्यमान पोलीस आयुक्त यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी व महाराष्ट्र शासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
