


राज्याचा अर्थसंकल्प विकासाचा सर्वसमावेशक ‘रोडमॅप’; ५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

पायाभूत सुविधा, शेतकरी आणि तीर्थक्षेत्र विकासावर भर
पिंपरी चिंचवड, ता.६ (प्रतिनिधी) : आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ आर्थिक घोषणांचा दस्तऐवज नसून, तो विकसित महाराष्ट्राचा एक व्यापक आराखडा आहे. शाश्वत, सर्व समावेशक, प्रगतशील आणि सुशासन असा विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसत आहे. ज्यामध्ये महापुरुषांचा आदर्श जतन करून विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप तयार करण्याचा दूरदृष्टीकोन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडला आहे.
मुंबई महानगराच्या धर्तीवर आता पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे ‘ग्रोथ हब’ म्हणून नावारूपास येणार आहेत. यामुळे पुणे जिल्ह्याला जागतिक पातळीवर एक नवी आणि आधुनिक ओळख प्राप्त होईल,” असा विश्वास चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र आज थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) देशात अव्वल स्थानावर असून ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ मध्येही राज्याने सुवर्णपदक पटकावले आहे. पुणे हे आधीच उद्योगांचे केंद्र आहे, मात्र आता ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) सारख्या अत्याधुनिक क्षेत्रात पुण्याला जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न या अर्थसंकल्पातून साकार होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक समूह उभारण्याचा संकल्प राज्याच्या औद्योगिक भरभराटीला नवी दिशा देणारा ठरेल.’इन्वेस्ट महाराष्ट्र’ नावाचे एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले जात आहे, आणि प्रत्येक जिल्ह्यात लघु आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन केली जातील. या धोरणामुळे सुमारे ५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
“शेतकरी आणि वारकरी संप्रदायासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आमदार जगताप म्हणाले, “बळीराजाला आधार देण्यासाठी सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी असलेल्या देहू येथील विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा घेतलेला संकल्प हा वारकरी संप्रदायाचा सन्मान करणारा आहे. जलयुक्त शिवार आणि वैरण विकासावर दिलेला भर कृषी क्षेत्राला नवा आयाम देईल.
“पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही भुयारी मार्ग (Subway) आणि उन्नत मार्गांचे जाळे उभारले जाणार आहे. पाच ज्योतिर्लिंग क्षेत्रांचा विकास हे या बजेटचे खास वैशिष्ट्य आहे.
याशिवाय, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ३१ सायबर गुन्हे महामंडळ, दिव्यांगांसाठी स्वतंत्र कौशल्य विकास केंद्रे आणि प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेतील महाराष्ट्राची उत्तुंग कामगिरी हे निर्णय राज्याला प्रगत बनवणारे आहेत.”आयुष्यमान भारत, शिवसृष्टी आणि शहरी आरोग्य आयुक्तालय यांसारख्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आरोग्याची आणि संस्कृतीची जपणूक करणारा हा अर्थसंकल्प ‘सर्वसमावेशक विकास’ साधणारा असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी नमूद केले.
आमदार शंकर जगताप म्हणाले पुणे जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये पुणे-शिरूर ५३ किमी लांबीच्या उन्नत मार्गासाठी ७,५१४ कोटी रुपये आणि तळेगाव-चाकण २५ किमी उन्नत मार्गासाठी ६,४९९ कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच, चाकण-शिक्रापूर दरम्यानच्या २८ किमी रस्त्याचे ५,२३२ कोटी रुपये खर्चून सहापदरीकरण करण्यात येणार असून, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान १९२ किमीचा नवीन ग्रीनफील्ड महामार्ग उभारला जाणार आहे, ज्याचा अंदाजित खर्च १४,८८६ कोटी रुपये आहे.
हडपसर ते यवत दरम्यानच्या ३१.५० किमी सहापदरी रस्त्यामुळे पुण्याबाहेरील वाहतूक अधिक सुलभ होईल. केवळ शहरेच नव्हे, तर ग्रामीण भागातील १००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीट रस्त्यांनी जोडण्यासाठी आशियाई बँकेच्या मदतीने ४,५०० कोटींचा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. पुणे लोणावळा रेल्वे महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि अटल सेतू यांना जोडणारा उन्नत मार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
—————————————–
“राज्याचा हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक घोषणा नसून, ‘विकसित महाराष्ट्राचा’ सर्वसमावेशक आराखडा आहे.शाश्वत, सर्व समावेशक, प्रगतशील आणि सुशासन असा विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प आहे. पुण्याला ‘ग्रोथ हब’ बनवण्याचा संकल्प आणि पायाभूत सुविधांवरील भर जिल्ह्याला जागतिक ओळख मिळवून देईल. शेतकरी कर्जमाफी आणि तीर्थक्षेत्र विकास यातून सरकारने वारकरी संप्रदाय व बळीराजाचा सन्मान केला आहे. ५ दशलक्ष नोकऱ्यांचे उद्दिष्ट युवकांसाठी प्रगतीची नवी कवाडे उघडणारे ठरेल. खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प प्रगत आणि सुशासनाकडे नेणारा गतिमान ‘रोडमॅप’ आहे.”
शंकर जगताप
आमदार पिंपरी चिंचवड शहर

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
