


- पाणी पुरवठा विभागाची माहिती
पिंपरी-चिंचवड:दि. ६: पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीच्या पाण्यात गाळ, झाडपाला, सांडपाण्यासह इतर कचरा वाहून येतो. त्यामुळे हे पाणी काही प्रमाणात गढूळ असते. मात्र महापालिकेच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये WHO व CPHEO च्या नियमांप्रमाणे शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पाणी नागरिकांना वितरित केले जाते.

पाण्याची चव व वास बदललेला जाणवत असला तरी ते पाणी पूर्णतः पिण्यायोग्य आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. तसेच पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळमधील पवना व आंद्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र पावसाळ्यातील चार महिने धरणातील साठा न वापरता नदीतील पाण्याचा वापर होतो. या कालावधीत नदीच्या पाण्यात गाळ, झाडपाला, व सांडपाण्यासारखा कचरा वाहून येतो. यामुळे पाणी गढूळ होते व TDS (Total Dissolved Solids) प्रमाण वाढते. याचा परिणाम पाण्याच्या चव व वासावर किंचित प्रमाणात होतो.
महापालिका रावेत बंधाऱ्यावरून अशुद्ध पाणी उचलते, जे प्राधिकरण व निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. तसेच आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यावरून उचलून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. येथे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व आवश्यक प्रक्रिया पार पाडली जाते. नंतर हे पाणी विविध टाक्यांमध्ये साठवले जाते आणि त्यामधून नागरिकांना वितरण केले जाते.
⸻
🔹 पाणी पुरवठा विभागाचे उपाय
महापालिकेच्या वतीने नागरिकांना योग्य प्रक्रिया केलेले व स्वच्छ पाणी देण्यात येते.
• जलशुद्धीकरण केंद्रात WHO , CPHEO च्या मानकानुसार प्रक्रिया
• पाईपलाइन व टाक्यांचे नियमित स्वच्छीकरण
• गढूळ पाण्याच्या तक्रारींची तत्काळ दखल व उपाय
• दररोज पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी
• किंचित चव असूनही पाणी पिण्यायोग्यच
⸻
🔹 नागरिकांनी घाबरू नये
पावसाळ्याच्या सुरुवातीला पाणी थोडं गढूळ होणे हे सर्वत्र स्वाभाविक आहे.
• नागरिकांनी पाणी उकळून वापरावे.
• गढूळ पाण्याच्या तक्रारी असलेल्या भागात विशेष लक्ष.
प्रमोद ओंभासे.
मुख्य अभियंता , पा पू.
⸻
🔹 आवाहन
शहरवासीयांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग कटिबद्ध आहे.
• पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया WHO , CPHEO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जात आहे.
• ज्या भागात गढूळ पाणी येत आहे, तेथील नागरिकांनी स्थानिक पाणीपुरवठा कार्यालय किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
• तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जाईल.
. प्रदीप जांभळे पाटील, अति आयुक्त

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️