


कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची भेट.

पिंपरी दि.२ : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात लक्षणीय यश मिळाले त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चांगल्या पद्धतीचे काम केले, अनेक ठिकाणी विजय प्राप्त झाला तर काही ठिकाणी थोडक्यामध्ये अपयश आले. महाराष्ट्रातील कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी त्यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करून त्यांना ऊर्जा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले आहे.
या पुणे येथे झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील कष्टकरी, असंघटित व कंत्राटी कामगारांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्यांवरही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने लागू केलेल्या श्रमसंहितांमुळे कामगारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. कामाच्या असुरक्षिततेबरोबरच वेतनवाढ थांबली आहे.
अनेक कामगारांना नियमित सेवेत घेण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने दीर्घकाळ काम करायला लावले जाते. आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा अशा मूलभूत सुविधा त्यांना नाकारल्या जात आहेत.
पिंपरी-चिंचवड, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा औद्योगिक भागांमध्ये काम करणाऱ्या लाखो असंघटित कामगारांचे जीवन अत्यंत हालाखीचे झाले आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना सुविधा नाही, आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत. महिलांचा शोषणाचा प्रश्न गंभीर असून बालमजुरीसुद्धा काही ठिकाणी वाढलेली आहे.
या पार्श्वभूमीवर नखाते म्हणाले की, “हे केवळ श्रमिकांचे नव्हे, तर मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. राज्यात सर्व कामगार संघटनांना एकत्र आणून आपण संघर्ष करू सर्व कामगारांच्या माध्यमातून एक सशक्त आंदोलन उभं करण्याची गरज आहे.
यावेळी जयंतराव पाटील यांनीही आश्वासन दिलं की, “कामगारांच्या हक्कासाठी असलेले काम सुरू ठेवा , त्यांच्या न्याय हक्कांसाठी पक्ष आपल्यासोबत राहील. आगामी काळात पिंपरी-चिंचवड, पुणे व अन्य ठिकाणी तसेच राज्यस्तरावर कामगारांच्या प्रश्नांवर विशेष बैठकींचं आयोजन करण्यात येईल.
राज्यातील कामगार चळवळीला संजीवनी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्ष कटिबद्ध आहे, असा विश्वास या बैठकीमधून पुन्हा एकदा व्यक्त झाला. त्यावेळी आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या नियोजनाबाबत ही चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने ,मनपा सदस्य किरण साडेकर, लाला राठोड आदी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️