


पुणे, दि. ६ ऑगस्ट २०२६ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह, स्वारगेट, पुणे येथे आज भारत टॅक्सीची पुण्यातील पहिली दर परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला पुणे शहर व परिसरातील मोठ्या संख्येने रिक्षा व कॅब चालक उपस्थित होते.

या परिषदेमध्ये भारत टॅक्सी अॅपवरील प्रवासी भाडे किती असावे, यावर सर्व चालकांमध्ये लोकशाही पद्धतीने सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सर्व उपस्थित रिक्षा व कॅब चालकांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांनी मंजूर केलेले अधिकृत दरच भारत टॅक्सीवर लागू असावेत, असा एकमताने निर्णय घेतला.
याचबरोबर, नागरिकांची सर्ज प्रायसिंग (Surge Pricing) किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त दरवाढीच्या माध्यमातून आर्थिक लूट होऊ नये, भाडे स्थिर, पारदर्शक व न्याय्य असावे, अशीही सर्व उपस्थित चालकांची एकमुखी भूमिका होती.
या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. केशव नाना क्षीरसागर, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा यांनी भूषविले. यावेळी भारत टॅक्सीच्या पुणे शहरातील पदाधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.
यावेळी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की, भारत टॅक्सी ही सहकारी तत्त्वांवर चालणारी व्यवस्था असल्याने कंपनीच्या पुढील कारभारातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये सामान्य रिक्षा व कॅब चालकांचा थेट सहभाग असेल. दरनिश्चितीपासून ते इतर धोरणात्मक निर्णयांपर्यंत सर्व निर्णय लोकशाही पद्धतीने, चालकांच्या मतांचा आदर राखून घेतले जातील. हीच भारत टॅक्सीची इतर खाजगी अॅग्रिगेटर कंपन्यांपासून वेगळी ओळख असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
परिषदेच्या शेवटी, भारत टॅक्सीवर मोठ्या संख्येने ट्रिप पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिक्षा व कॅब चालकांचा गौरव करण्यात आला. त्यांना प्रोत्साहनपर उपक्रम म्हणून अमूल यांच्या सौजन्याने रेशन किट प्रदान करण्यात आले.
यावेळी डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी उपस्थित चालकांना संबोधित करताना सांगितले की, “भारत टॅक्सी ही चालकांची स्वतःची सहकारी व्यवस्था आहे. येथे निर्णय काही मोजक्या लोकांकडून नव्हे, तर चालकांच्या सामूहिक सहभागातून घेतले जातील. प्रवाशांना न्याय्य व स्थिर दर, तर चालकांना सन्मानजनक उत्पन्न मिळवून देण्यासाठी भारत टॅक्सी सातत्याने कार्यरत राहील.”
– डॉ. केशव नाना क्षीरसागर
अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
